कट्टा
....
तसा ‘कट्टा’ हा सगळ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकजण
आपल्या आयुष्यात या कट्ट्याचा अनुभव घेत असतो, अगदी लहानपणापासून ते
म्हतारपणापर्यंत. संकल्पना तीच पिढ्या मात्र वेगवेगळ्या. थोडे
विचित्र वाटेल पण कट्ट्याला पण मोठा इतिहास आहे. कट्ट्यावरच संभाषण, समुपदेशन हे फार परिणामकारक असत म्हणून तर तुकाराम महाराज, बुद्ध, संत महात्म्यांनी लोकांना मार्गदर्शन
करण्यासाठी या माध्यमाचा प्रभावी उपयोग केला. आजही महत्वाच्या खलबती , मसलती अशाच एखाद्या कट्ट्यावर जन्म घेतात. कट्टा हे आपले विचार मांडण्याच
एक मुक्त व्यासपीठ आहे जिथं आपले विचार मांडायला परवानगीची गरज नसते.
पिढीनुसार, काळानुसार, स्थितीनुसार कट्टा व
कट्ट्यावरचे विषय बदलत असतात. कट्ट्यावर माणूस घडू पण
शकतो अन बिघडू पण.
कट्टा
शाळेत असतो, कट्टा महाविद्यालयात असतो, कट्टा
होस्टेल वर असतो, कट्टा गावात असतो अन कट्टा कॉलनीत पण असतो.
एकदा
अशाच एका कट्ट्याला भेट देण्याचा योग आला. मी कट्ट्यावरच्या लोकांमध्ये अनोळखी
असल्याने कट्ट्या वरचे संभाषण फक्त ऐकण्याच काम करत होतो. कट्ट्यावरचे विनोद ऐकून
मी पण हसत होतो.खूप बरं वाटत होत. कट्ट्यावर वेगवेगळ्या वयाच्या पाच व्यक्ती होत्या २८,२५,१८,२३,२५ अशा
(काहीस अंदाजे). आता
पर्यंत कट्ट्या वरचे विनोद एका साधारण मर्यादेपर्यंत होत होते पण, थोड्या
वेळाने समोरून एक जोडप गेलं अन सगळ्यात मोठ्या व्यक्तीने समोरून जाणाऱ्या
जोडप्याची टर उडवली तशी सगळ्या लोकांत खस खस पिकली. अन मग सुरु झाली कट्ट्यावरची चर्चा. काहीशा
वेळाने समोरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याच्या वैयक्तिक/ खासगी आयुष्या बद्दल
शेरेबाजीला सुरवात होते. विषय अगदी एखाद्याच्या बायको
पासून GF पर्यंत होता.
आता पर्यंत चर्चा बऱ्यापैकी mature व्यक्तींमध्ये
होत होती. पण कट्ट्यावर एक १८ वर्षांचा मुलाचा
पण सहभाग होता.
एकंदरीत वातावरणावरुण त्यालाही इतरांच लक्ष वेधण्याची गरज भासु लागली. सर्वांच लक्ष स्वताकडे खेचण्यासाठी तो समोरून जाणाऱ्या व्यक्तिंची टिंगल त्यांना ऐकू जाइल अशा आवाजात करतो अन त्याचं धाडस पाहून कट्ट्यावर मोठी खस खस पिकते. आता किरकोळ गोष्टी
वरुन केली जाणारी चेष्टा वाह्यात रूपात तो करायला लागतो अन या त्याच्या या धाडसाला
( का वाह्यात पणाला ) कट्ट्यावरून मोठी दाद मिळते अन विशेष म्हणजे वाह्यात टोमने
मारण्यासाठी कट्ट्यावर च्या सभासदांनी कुठलीही वयोमर्यादा निश्चित केली न्हवती,वयस्कर असो वा तरुण आमच्या शेरेबाजीला तोंड द्यावच लागेल हा
अलिखित नियम लागू होता. अन मग नुकतच तारुण्यात पदार्पण केलेल्या त्या मुलाला आपण केलेली वाह्यात शेरेबाजी ही एखाद्या खुप मोठ्या पराक्रमाप्रमाणे वाटायला लागली.
आता साधारण अन मर्यादेपर्यंत होणाऱ्या चर्चेच रूपांतर वाह्यात होण्याच कारण त्याच्या
प्रत्येक चेष्टेला मिळालेला प्रतिसाद समजायचा का त्या मुलाचे वय समजायचं , का याचा दोष त्याला भेटलेल्या कट्टा मित्रांना द्यायचा ????
कारणे
बरीच असतील. असो ...
कधी कधी
कट्ट्यावर एखाद्या बुजऱ्या मुलाला टार्गेट करून त्याच्या एखाद्या व्यंगाबद्दल
हिणवल जात याचा परिणाम म्हणून त्याच्यात त्याच्या व्यंगाबद्दल न्यूनगंड निर्माण
होतो. अशा टार्गेट झालेल्या मुलांच्या मनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, एक तर
अशी मुले आयुष्यभर झुरत तरी राहतात अथवा कट्ट्यावर विशेष प्रतिसाद मिळण्यासाठी
काही तरी भन्नाट करून दाखवण्याचा प्रयत्न करतात, आता हे
भन्नाट काय असेल याचा मात्र नेम नाही.
चांगल्या-वाईट गोष्टींना कट्ट्यावर
मिळणारा instant प्रतिसाद हा कुटलीही
विचित्र गोष्ट करण्यासाठी भरभरून धाडस देतो आणि अशाच एका कट्ट्यावरुन अस धाडस घेउन बाहेर पडलेल्या मुलाच्या
वाह्यात चेष्टेला याच कट्ट्या वरची एखादी व्यक्ति बळी
पडणार नाही याची खात्री कोण देणार ? तसही पृथ्वी गोल आहे हा शोध लागलेलाच
आहे, फिरून फिरून गोष्टी तुम्हालाच परत भेटतील.
कट्ट्यावर
बऱ्याच वाईट गोष्टी पण शिकल्या अथवा शिकवल्या जातात. कट्ट्यावर सिगारेट ओढण्याच
ट्रेनिंग मिळू शकत, कट्यावर
दारू पिण्याच ट्रेनिंग मिळू शकत, कट्यावर कोणालाही वाह्यात अश्लील टोमणे मारण्याच ट्रेनिंग मिळू शकत
त्याचबरोबर कट्ट्यावर चांगले पण बरच मिळेल. आपण कट्ट्या वरून काय घेतो आणि त्याचा
उपयोग कसा करतोय हे महत्वाच आहे.
खर तर
कट्टा म्हणजे आपल्या एकटेपणावरचं जालीम औषध आहे. कट्टा हा हसण्या खिदळण्यासाठीच
असतो. कट्टा म्हणजे आपल्या आनंदासाठी माणसांने
निर्माण केलेलं एक उत्तम अन मुक्त ‘व्यासपीठ’ आहे. याच कट्ट्यावर सुख-दुख वाटली
जातात, याच
काट्यावर कधी कधी गाण्याच्या मैफिली सजतात, राजकारणाच्या फैरी झडतात
आणि याच कट्ट्यावर आपण एखाद्याला जगण्याची नवीन उमेद देऊ शकतो.
काय
गम्मत आहे नाही ! एक काळ असा होता कि साने गुरुजींची आई त्यांना पोरांच्या
दंगामस्तीत जबरदस्ती पाठवायची जेणेकरून ते पोहायला शिकतील आणि त्यांची भीती नाहीशी
होईल. बऱ्याच क्रांतिकारक /स्वातंत्र्यसैनिकांनी कट्ट्यावरच देशप्रेमाचे धडे गिरवले.
त्यावेळच्या पालकांनी त्यांच्या पोरांना कट्ट्यावर सोडल ते स्वातंत्र्यसैनिक झाले. आज पालक पोरांना कट्ट्यावर
जाण्यास बऱ्याचदा विरोध करतात कारण तिथून पोरग कुटल्या विषयाची ‘PHD’ घेऊन
येईल याची खात्री नाही.
एकंदरीत
लिखाणाचा उद्देश
हा आहे की आयुष्यात आपण कुठल्या न कुठल्या कट्ट्याचा भाग असतो. जर देवाच्या कृपेने
आपण थोडे सुजाण असाल तर विपरीत अन विकृत आनंदाला प्रतिबंध घाला. कोणत्या गोष्टीला ‘प्रोत्साहन’
द्यायचं अन कोणत्या गोष्टीवर ‘आक्षेप’ घ्यायला हवा याची जाणीव ठेवा. कारण कट्टा म्हणजे एक
कारखाना आहे अन त्यात काम करणारे कामगार म्हणजे
आपण सहभागी कट्टा मित्र असतो आणि आपल्या कारखान्यातून चांगल product तयार
व्हावं हि आपली जबाबदारी आहे. हो कि नाही !...
धन्यवाद